आले लागवड तंत्रज्ञान
आले लागवड तंत्रज्ञान
जमीनआले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५टन मिसळावे.
✓चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य.
✓नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य.
✓हलक्या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.
✓जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी.
लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात.
✓कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन.
✓जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते
पूर्वमशागत :
~लागवडीपूर्वी जमिनीची एक फुटापर्यंत खोल उभी, आडवी नांगरट करावी.
~१ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हे पीक जमिनीत १८ महिन्यांपर्यंत राहत असल्यामुळे जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी.
~जमिनीतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड-गोटे वेचून काढावेत.
शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.
लागवड कशी व केंव्हा करावी
•लागवड एप्रिल - मे महिन्यांत पूर्ण करावी.
•लागवडीसाठी माहीम, रिओ-डी-जानेरो, कालिकत इत्यादि जाती निवडाव्यात.
जाती :
ज्या भागात हे पीक घेतले जाते, त्या भागाच्या नावावरून जात ओळखली जाते. उदा. कालिकत, कोचीन, आसाम, भारत, उदयपुरी, औरंगाबादी, गोध्रा इ.राज्यात माहिम जातीची लागवड केली जाते.
काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका या जातींचा समावेश आहे.
माहीम :
महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी : २१० दिवस
मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवे
सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्टरी २० टन
•लागवडीसाठी हेक्टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. बेणे २५ते ४५ ग्रॅम वजनाचे असावे, डोळे फुगलेले असावेत.
•लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. यासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ईसी) +१५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५०%डब्लू.पी.) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून यामध्ये बेणे २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.
•लागवडीपूर्वी हेक्टरी दोन टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी.
• लागवड करताना ९० सें.मी. रुंदीचे आणि २५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून २२.५ X २२.५ सें.मी. अंतरावर लागवड करावी.
•माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हेक्टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये द्यावे. यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर दीड महिन्याने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एक महिन्याच्या अंतराने द्यावा. लागवडीच्या वेळी स्फुरद ७५ किलो आणि पालाश ७५ किलो द्यावे. आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी.
•आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे.
•आल्यावर कंदमाशी, पाने खाणारी अळी, रसशोषण करणाऱ्या किडी, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा, तसेच करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड व रोग नियंत्रण करावे. लागवडीनंतर
•आठ ते दहा महिन्यांत आले पीक काढणीला येते. हेक्टरी १५ ते २० टन आल्याचे उत्पादन मिळते.
लागवडीच्या पद्धती : सपाट वाफे पद्धत :
✓पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.
✓जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत.
✓सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
सरी वरंबा पद्धत :
✓मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी.
✓लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वरती सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी.
✓दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.
रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत :
✓काळ्या जमिनी, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.. या पद्धतीमध्ये १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते.
✓जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गादी वाफ्याची) लांबी ठेवावी.
✓१२० सें.मी. वरती सरी पाडून घ्यावी म्हणजे मधील वरंबा ६० सें.मी. रुंदीचा होईल.
✓दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ६० सें.मी. सोडावी.
या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्यावरती २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. अंतराने लागवड करावी.
लागवडीचा हंगाम आणि लागवड :
✓लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
✓लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी.
मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत.
✓बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे.
हेक्टरी २५ क्विंटल बियाणे लागते.
लागवड करताना कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो, त्याची चांगली वाढ होते.
जर डोळा खाली आणि आतल्या बाजूला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी.
बीजप्रक्रिया :
✓बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के) १५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. २० मिनिटानंतर बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
✓बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.
बियाणे प्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.
तणनाशकाचा वापर :
✓लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ४ ते ५ ग्रॅम ॲट्राझीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✓लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ४ ते ५ मि.लि. ग्लायफोसेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✓उगवण सुरू झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.
खत व्यवस्थापन :
या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्यकता असते.
✓संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत.
हेक्टरी १२० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.
✓नत्र खताचा निम्मा हप्ता आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा.
✓राहिलेला अर्धा नत्र उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी हेक्टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्टरी ३७.५ किलो पालाश दोन वेळा मिसळावे.
पाणी व्यवस्थापन :
✓लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती पद्धतीने केली जाते. तर कमी पावसाच्या प्रदेशात पाणी देऊन केली जाते.
✓सुरवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो.
✓लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच द्यावे.
पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
✓पावसामध्ये १० ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे.
✓हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतींचा वापर करावा.
✓गादीवाफा पद्धतीने लागवड करावी.
एका गादीवाफ्यावर एक ठिबक सिंचनाची नळी टाकून दोन लिटर तास पाणी देणाऱ्या तोट्या बसवाव्यात.
जमिनीच्या मगदुरानुसार ठिबक सिंचन संच सुरवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ-संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.
आंतरमशागत :
✓तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी खुरपणी करावी.
✓उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावी. यासाठी लांब दांड्यांच्या खुरप्याने माती हलवली जाते. यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतूमय मुळे फुटतात.
✓पिकास पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात. त्यास हुरडे बांड असे म्हणतात.
उशिरात उशिरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यास सुरवात होते.
✓ उटाळणी केली नाही, तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते.
✓उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.
उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.
आंतरपिके :
पीक २५ टक्के सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.
✓आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार यांसारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
संजीवकांचा वापर :
✓उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरिया व नॅप्थील ॲसेटिक ॲसिडचा वापर ६० आणि ७५ व्या दिवशी शिफारसीप्रमाणे करावा फवारावे.
✓फुटव्याच्या संख्या वाढविण्यासाठी २०० पी.पी.एम. प्रमाणात इथेफॉनच्या ७५ व्या दिवसांपासून १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
काढणी आणि उत्पादन :
✓पीक ७५ टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी करता येते.
✓हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी सहा महिन्यांनी करावी.
✓विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागवडीनंतर आठ महिन्यांनंतर पुढे काढणी करावी.
शक्यतो बाजारातील मागणीप्रमाणे काढणी करावी.
गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
✓पाला कापून गड्डे, बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावीत.
✓काढणीनंतर कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत. त्यानंतर बाजारात पाठवावेत.
उत्पादन :
प्रतिहेक्टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १५ ते २३ टन.
Agricos💚
✍️Vaishnavi Nimkar
#शेती हाच ध्यास शेतीचा विकास
#एक पाऊल आधुनिक शेतीकडे २०२५
Comments
Post a Comment